#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती
शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर.
नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्या मध्यभागी थोड्या उंचावर एक आखीवरेखीव मंदिर दिसते.
खंडेश्वराचे अर्थात शिवाचे हे मंदिर इथे असलेल्या शिलालेखानुसार सुमारे ८५० वर्षापूर्वी बांधले आहे. राजा रामदेवराय यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी या मंदिराचे बांधकाम शके ११७७ म्हणजे इ. स. ११५४ मध्ये केले असल्याचा उल्लेख मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या शिलालेखात आहे.
हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले आहे. कोरीव दगडांचे बांधकाम आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बांधकामात विटांचा वापर करण्यात आला आहे. या विटा विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या आहेत. आकाराने मोठ्या असलेल्या या विटा पाण्यात टाकल्या की पाण्यावर तरंगतात.
राज परिवार, राज नर्तकी, शिव पार्वती आणि परिवार यांच्या अत्यंत कोरीव आकृती, दागिने, वस्त्रांचा पोत, नाजुकपणा या सर्व वैशिष्ट्यांसह खांबावर कोरल्या आहेत. नाजुक कोरीव काम केलेले हे खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दगडी कोरीव खांबांनी सुशोभित केलेल्या या प्रशस्त सभामंडपामध्ये एकूण तीन मंदिरे आहेत. पूर्वेकडे मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या गाभार्यात तीन चार पायर्या खाली उतरून मग आपण शिवलिंगापाशी पोहचतो. काळ्या पाषाणातले भव्य शिवलिंग इथे आहे. या गाभार्याच्या वरच्या बाजूला आणखी एक गाभारा आहे. त्याला ध्यानगृह म्हणतात. असे म्हणतात की हे ठिकाण पुर्वी ऋषींच्या तपसाधनेसाठी बांधण्यात आले होते. सध्या हे ध्यानगृह बंद करण्यात आले आहे. त्यानंतर मंदिराच्या उत्तरेला शिव पार्वतीच्या कोरीव मूर्ती असलेले एक मंदिर आहे आणि दक्षिणेला नरसिंहाचे मंदिर आहे. या तिन्ही मूर्ती अत्यंत कोरीव आहेत.
या तिन्ही मंदिरांना मिळून एकच भव्य सभामंडप आहे. त्यासमोर एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या आवारात एक शंभर फूट उंचीची दीपमाळ दृष्टीस पडते. या दीपमाळेच्या वर चढून जायला पायर्या आहेत या पायर्या चढून वर गेले की नांदगाव खंडेश्वर आणि आजूबाजूच्या खेड्यांचे एक विहंगम दर्शन होते.
या ठिकाणाला आणि महादेवाला खंडेश्वर का म्हणतात याची एक दंतकथा स्थानिक सांगतात. त्याप्रमाणे पूर्वी या ठिकाणी कौंडिण्य ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या शिष्यांमध्ये खंड्या नावाचा एक त्यांचा पट्टशिष्य होता. या पट्टशिष्याच्या आराधनेसाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि या महादेवाचे नाव पडले खंडेश्वर.
या खंडेश्वराला पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस नित्य पूजा बांधली जाते. महाशिवरात्री हा इथला मुख्य उत्सव. तेव्हा इथे मोठी यात्रा भरते. याशिवाय श्रावण सोमवारचेही इथे खूप महत्त्व आहे. श्रावण सोमवारी हजारो भाविक इथे दर्शनाला येतात. स्थानिक लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की, श्रावण सोमवारी कोंडेश्वर, खंडेश्वर आणि बोंडेश्वर यांचे दर्शन घेणार्याला काशीला गेल्याचे समाधान मिळते. यापैकी बोंडेश्वराच्या खाणाखुणा आज सापडत नसल्या तरी कोंडेश्वर आणि खंडेश्वराला पायी जाणार्यांची संख्या खूप मोठी आहे.
आठ-साडेआठ हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर आजही यथास्थित आहे. त्याचे कोरीव काम, मंदिराचा रम्य परिसर हे सारे अनुभव घ्यावा असेच आहे. गुरुंनी शिष्याच्या उपासनेसाठी स्थापन केलेला असा हा खंडेश्वर कित्येकांचे आराध्य दैवत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा