मुख्य सामग्रीवर वगळा

रावणाची दहातोंडी मूर्ती


अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते. काय आहे ही अनोखी प्रथा?

विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..

रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..

 त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.

सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच  काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.

या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.

सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात. गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले.

त्या मूíतकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.

शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. दहा तोंडांची, अहंकारी भाव दर्शवणारी युद्ध पोशाखातील शस्त्राधारी मूर्ती असल्याने गावकऱ्यांनी रावणाची मूर्ती म्हणून या मूर्तीवर शिक्कामोर्तब केले. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे रावण जरी दुष्ट, कपटी, अहंकारी असला तरी सांगोळ्यात या रावणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.. दसऱ्याला संध्याकाळी रावणाची विशेष पूजा गावकऱ्यांद्वारे केली जाते.. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात. या गावातील रहिवासी व निवृत्त शिक्षक दिनकर पोरे याविषयी सांगतात की, दसऱ्याला ठिकठिकाणी रावणाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातो. पण या निषेधात उन्मादच जास्त दिसतो..

रावण जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो एक प्रचंड ज्ञानी पंडित होता असं म्हटलं जातं, हे आपण सोयीस्कर विसरतो.. रावणाने साक्षात शंकरांना प्रसन्न करत अजेय वरदाने मिळवली होती, असं मानलं जातं. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही.. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही. इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते.

गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात.. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात; किंबहुना सातपुडय़ाच्या पायथ्याचा भाग हा अतिदुर्गम तथा डोंगराळ, घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याच पर्वतरांगांमध्ये मेळघाट वसलेलं आहे.

कोरकू हे रावणाला देव मानतात. कोरकू आदिवासींमध्ये असे मानले जाते की, महादेव त्यांचे पिता आहेत, शिवाय त्यांच्या उत्पत्तीसाठी रावणाने भगवान शिवाजवळ प्रार्थना केली आणी रावणाच्या भक्तिभावाने प्रसन्न होत महादेवाने कोरकूंची सृष्टी निर्माण केली. यासाठीच कोरकू हे दसरा तथा होळीला रावणाची पूजा करतात.

आदिवासी कोरकू फक्त रावणालाच नव्हे तर त्याचा पुत्र इंद्रजीत मेघनाद यालासुद्धा मनोभावे पूजतात. आदिवासी कोरकूंची अशी धारणा आहे की एकदा मेघनादने युद्धात कोरकूंचे रक्षण केले होते. यासाठीच कोरकू हे मेघनादपूजक म्हणूनपण ओळखले जातात. आदिवासी कोरकूंच्या गावात पूजेसाठी भलेमोठे दोन लाकडी उंच खांब रोवलेले असतात. मेघनाद खांब म्हणूनच ते ओळखले जातात.

पोस्ट - संतोष विनके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भाचा प्राचीन इतिहास

विदर्भाचा प्राचीन इतिहास :- विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात. सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश हो...

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात  सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे. अभयारण्यास जाण्याचा मार्ग - अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत.  शहानूर गाव हे या अभयारण्य...

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...