#VidarbhaDarshan - मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील जयपूर हे छोटं ऐतिहासिक गाव. मिर्झा राजे जयसिंग विदर्भ दौर्यावर असताना काही काळ जयपूर येथे वास्तव्यास होते. त्यांनी येथे पायरी विहीर आणि छत्री बांधली. छत्री सध्या अस्तित्वात नाही. पण विहीर मात्र अजून तग धरुन जयसिंगांची साक्ष म्हणून आहे.
ही पुरातन विहीर अष्टकोणी आहे. विहीरीचा खालील भाग दगडात बांधलेला आहे. आणि वरील भाग जुन्या काळातील चपट्या विटांनी बांधलेला आहे. विहीरीच्या आत खोल्या आहेत. विहीरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी पायर्या आहेत. विहीर अजून सुस्थितीत आहे, साफसफाई आणि डागडुजी केल्यास सुंदरता वाढेल.
जयपूर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे मिर्झा राजे जयसिंगांच्या खाणाखुणा सापडतात. गावाच्या पुर्व दिशेला सुर्य मंदिर आहे. विहीर परिसरात तीन प्राचीन समाधी होत्या, त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. आधी जयपूर आणि कोथळी एकच गाव होते. जयपूर हे नाव जयसिंग यांच्या नावावरुनच ठेवले गेले आहे. जवळच गोसिंग गाव आहे त्या गावाचा संबंध सुध्दा जयसिंगाशी असावा. जयसिंगांचे मुळ गाव राजस्थान मधील जयपूरच आहे त्यामुळे त्यांनी या गावाला जयपूर नाव दिले.
गावात प्राचीन वाडे, देशमुख यांची पुरातन दोन माळ्याची इमारत आहे. हे गाव श्री संत गजानन महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झाले आहे. गजानन महाराज यांच्या पादुका जयपूर गावात आहेत. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून गावात हनुमान मंदिर आणि मस्जिद भिंतीला भिंत लागून आहे.
माहिती - श्याम देवकर
फोटो - दिपक वानखडे, दिनेश खिरोडकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा